घरगुती वाद कि टोळीयुद्ध.? आंदेकर खून प्रकरणाचे कोडे सुटण्याच्या मार्गावर..
अकरा महिन्यांपूर्वी झालेला निखिल आखाडेचा खुन, खुनाचा आरोप असलेली आंदेकर टोळी, बहिणींबरोबरचा कौटुंबिक वाद हे सारे धागेदोरे जुळवण्याच्या मार्गावर पुणे पोलिस आहेत. घरगुती वादाचे कारण घेत, टोळीयुद्धातून निखिल आखाडे खुनाचा बदला, आपल्या टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच वनराज आंदेकरचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिस अधिकारी व्यक्त करीत आहेत.
अकरा महिन्यांपूर्वी झालेला निखिल आखाडेचा खुन, खुनाचा आरोप असलेली आंदेकर टोळी, बहिणींबरोबरचा कौटुंबिक वाद हे सारे धागेदोरे जुळवण्याच्या मार्गावर पुणे पोलिस आहेत. घरगुती वादाचे कारण घेत, टोळीयुद्धातून निखिल आखाडे खुनाचा बदला, आपल्या टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच वनराज आंदेकरचा खून करण्यात आल्याचा संशय पोलिस अधिकारी व्यक्त करीत आहेत. कौटुंबिक आणि संपत्तीचा वाद ही तत्कालिक कारणे असून, सोमनाथ गायकवाड याने आंदेकरच्या खुनाचा कट रचल्याचा संशय आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके फरार आरोपींच्या मागावर असून, सर्व शक्यता गृहीत धरून तपास केला जात आहे.
माजी नगरसेवक आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आंदेकर याच्यावर धारदार हत्याराने सपासप वार करून आणि गोळ्या झाडून रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास खून करण्यात आला. या प्रकरणी बंडू आंदेकरने दिलेल्या तक्रारीवरून दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये संपत्तीच्या वादातून वनराजच्या बहिणी आणि त्यांच्या नवऱ्यांनी खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांना हा प्रकार टोळीयुद्धात घडल्याची दाट शंका येत आहे.
१८ जणांना अटक
पोलिसांनी या प्रकरणी संजिवनी जयंत कोमकर, जयंत लक्ष्मण कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, प्रकाश कोमकर, अनिकेत दुधभाते, तुषार कदम, सागर पवार, पवन करताल, सॅम काळे यांच्यासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. जयंत, गणेश व प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि संजिवनी जयंत कोमकर यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, प्रथमदर्शी १५ आरोपी निष्पन्न झाले असले तरीही प्रत्यक्षात यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंदेकर-ठोंबरे टोळीतील संघर्ष
आंदेकर टोळीने निखिल आखाडे आणि अनिकेत दुधभाते यांच्यावर ऑक्टोबर २०२३मध्ये हल्ला केला होता. त्यात आखाडेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. दुधभाते जखमी झाला होता. जखमी दुधभाते आणि आखाडेचा भाऊ सागर पवार या दोघांचाही हल्लेखोरांमध्ये समावेश आहे, अशी पोलिसांची माहिती आहे. सूरज ठोंबरे टोळीवर ‘मकोका’ कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सोमनाथ गायकवाडची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. गायकवाड दोन ते अडीच महिन्यांपूर्वी जामीनावर बाहेर आला. त्याला बाहेर काढण्यासाठी सॅम काळे याने विशेष प्रयत्न केल्याची पोलिसांनी माहिती आहे.
‘वनराज’च लक्ष्य का?
वनराज आंदेकर हा गुन्हेगारीत सक्रिय नव्हता; तसेच निखिल आखाडेच्या खून प्रकरणातही तो आरोपी नव्हता. वनराज आंदेकरवर हल्ला झाला, त्या वेळी त्याचा चूलत भाऊ उपस्थित होता. मात्र, हल्लेखोरांनी केवळ वनराजवर हल्ला केला. या मागेदेखील कारण असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. निखिल आखाडे खून प्रकरणात आंदेकर टोळीवर ‘मकोका’ कारवाई करण्यात आली होती. त्या वेळी वनराजने राजकीय वजन वापरून सर्वांची जामिनावर सुटका केल्याची चर्चा होती; तसेच राजकारणात सक्रिय असलेल्या उदयकांत आंदेकरच्या मृत्यूनंतर वनराज आंदेकर टोळीचा 'आधार' होता. त्यामुळे आंदेकर टोळी अस्थिर करण्यासाठी वनराजला लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोमकरची नाराजी नेमकी काय?
गणेश कोमकर हा आंदेकर टोळीचा सक्रिय सदस्य होता. त्याच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत. उदयकांत आंदेकरच्या निधनानंतर टोळीचे नेतृत्त्व करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, आंदेकर कुटुंबातील अन्य तरुणांना ती संधी देण्यात आली. त्यामुळे कोमकर नाराज होता. त्यातूनच त्यांचे वाद वाढले होते. संपत्तीचा वाद हादेखील एक भाग आहे, असे पोलिस सांगत आहेत.